( रत्नागिरी )

जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा हा राज्यात सर्वोत्तम मानला जातो. मात्र अनेक वर्षे जिल्हा परिषदेची शिक्षक भरती न होवू शकल्याने रिक्त पदांची संख्या वाढत निघाली आहे. आंतरजिल्हा बदली व सेवानिवृत्त शिक्षकांमुळे २ हजार पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

सध्या या वर्षीची आंतरजिल्हा बदली अंतिम टप्प्यात असून एक हजार पात्र शिक्षकांपैकी पहिल्या टप्प्यात ३४६ शिक्षकांना सोडण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षणाचा बट्ट्याबोळ उडणार आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली प्राप्त शिक्षकांचा विषय गाजत आहे. या प्रक्रियेत राजकीय पुढाऱ्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात येत आहे. जिल्हा बदलून जाणाऱ्यांची संख्या बघता जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या फारच कमी म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. जिल्हा बदलून जाणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही अडथळा न आणता अगदी मुक्तहस्ते जि.प. प्रशासन सोडत आहे. गतवर्षी ७१५

शिक्षकांना रातोरात सोडले होते. सध्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये ३४६ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. मात्र नवीन शिक्षक रुजू होईपर्यंत बदली पात्र शिक्षकांना सोडण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या बदल्यांमुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या २३०० पर्यंत पोचली.

ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार २०२२ मध्ये जिल्ह्यात रिक्त पदे नसल्यामुळे हजारो शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करता आलेला नव्हता. त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यामध्ये विधवा, माजी सैनिक, आजारी या संवर्ग एकमधील आणि सर्वसाधारण गटातील शिक्षकांना संधी दिली होती. गेली सुमारे १ हजार शिक्षकांचे प्रस्ताव आले. संवर्ग १ मधील सुमारे दिडशे प्रस्तावांची छाननी करण्यात आली. २९ डिसेंबरला शिक्षकांच्या लॉगीनला बदली पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली.