साताराः छत्रपती शिवाजी महाराज यांचा असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.
उदयनराजे म्हणाले, 'राज्यात, देशात आज ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. परदेशातून लोक येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे नाव त्यांच्या कानावर पडते. पण शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर मोठ्या-मोठ्या स्थळांना, ठिकाणांना त्यांचं नाव देण्याची गरज काय? हे बेगडी प्रेम कशासाठी? भारत महासत्तेकडे गेला पाहिजे असे आपण म्हणतो. पण हे असेच राहिले तर देशाचे छोटे छोटे तुकडे होतील. हे देशाच्या अखंडतेला घातक आहे. या लोकांना कधी कळणार. ही नाटकं तरी करता. नका ठेवू शिवाजी महाराजांचा फोटो. त्यांचे नावच पुसून टाकू ना. विमानतळाला तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव देता. देश परदेशातून लोक येतात तेव्हा त्यांच्या कानावर शिवाजी महाराजांचे नाव पडतं. कशाला पाहिजे, जाऊ द्याना कशाला हवं बेगडी प्रेम. रेल्वे टर्मिनसला तरी का नाव द्यायचं. शिवजयंती तरी करा साजरी करायची?'
'उदयनराजे यांना हे बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांनी तोंडाला रुमाल लावला. कंठ दाटला. मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा व्यक्तीविरोधात कारवाई करत नसाल तर कुणालाही शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मीही वेडंवाकडं वागलो तर मलाही नाव घ्यायचा अधिकार नाही,' असेही उदयनराजे भोसले म्हणाले.