पनवेल: एका बेकरीत काम करणाऱ्या 17 वर्षीय युवकाचा पानटपरीला धक्का लागला म्हणून दोघांनी चाकू भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील कामोठे परिसरात घडली आहे. विशाल मौर्या असे धक्का लागल्याने हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण 

विशाल हा नेहमीप्रमाणे बेकरीचे काम संपवून रात्री 11 च्या सुमारास जवळच असलेल्या एका पान टपरीवर पान खाण्यासाठी आला. त्याचवेळी रवींद्र हरियानी आणि राज वाल्मिकी हे दोघे पान खात होते. त्याचवेळी या दोघांना विशालचा चुकून धक्का लागला. याच कारणाने या दोघांनी आधी त्याला लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. पानवाल्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी राज याने आपल्या जवळ असलेल्या चाकू विशाल याच्या पाठीत खुपसला आणि ते पळून गेले. त्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी गुप्त माहितीच्या आधारे कामोठे पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना नेमकी का घडली, हे प्रकरण नक्की काय आहे, तसेच धक्का लागण्याचे कारणातून ही घटना घडली की यामागे अजून काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, धक्का लागल्याने थेट हत्या केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमध्येही पत्नीची हत्या 

बीडमधूनही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीला सोबत येत नसल्याने 35 वर्षीय महिलेला पतीनेच विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली. ही धक्कादायक घटना बीडच्या केज तालुक्यातील जोला येथे घडली. ऊसतोडणीला सोबत येत नसल्याने महिला, पतीसह तिघांनी विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक उघडकीस आली. या महिलेवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहे. राहीबाई अशोक ढाकणे (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.