रत्नागिरी : मुंबई ते गोवा संपर्क क्रांती रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांची बॅग लांबवल्याची घटना घडली आहे. या चोरीत दागिन्यांसह 40 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनदीप कुमार (33, मंगरहील, गोवा) हे संपर्क क्रांती ट्रेनमधून प्रवास करत होते. रत्नागिरी रेल्वेस्थानक येण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर भोके येथे त्यांच्या काळया रंगाची हॅन्डबॅग अज्ञाताने चोरुन नेली. या बॅगेत 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 3 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, 8 हजार रुपये किंमतीचा रेडमी नोट 10 प्रो कंपनीचा मोबाईल हॅन्डेस, 4 हजाराच्या चांदीच्या बांगडया व पैंजण, 4 हजार 700 रुपयांची रोख रक्कम, कागदपत्रे असा एकूण 39 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

मनदीप कुमार यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञातावर भा. द. वी. कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.