बीड (प्रतिनिधी) देशभरात सध्या सुरु असलेली राहुलजी गांधी यांची "कन्याकुमारी ते काश्मीर" भारत जोडो पदयात्रा दि. ८ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात येत असुन खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वात बीड तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सुरू असलेली १५० दिवसाची भारत जोडो पदयात्रा जवळपास १४ राज्यांतून ३७०० की.मी. प्रवास करत देशातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राहुलजी गांधी रस्त्यावर उतरलेले आहेत. गांधी परिवाराने नेहमीच त्याग आणि समर्पणाची भुमिका घेत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व विकासाचे राजकारण करत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केलेले आहे. शतकानंतर अशी एखादी ऐतिहासीक पदयात्रा निघत असते व आज जनता मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होवुन राहुलजी गांधी यांना पाठबळ देत आहे. तेलंगणातुन महाराष्ट्रात या यात्रेचे आगमन होत असुन या पदयात्रेत बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील साहेब राहुलजी सोबत असणार आहेत त्यांच्याच नेतृत्वात बीड तालुक्यातील कार्यकर्ते, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता या ऐतिहासिक भारत जोडो पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे यांनी दिली.