औरंगाबाद : विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पतीला मनसोक्त दारू पाजून त्यानंतर त्याच्यावर पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तब्बल बारा दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि सारिका या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहू लागले होते. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळाले आणि तो सारिका सतत त्रास देऊ लागला. तसेच पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करायला लागला. यादरम्यान तो अनेकदा दारू पिऊन सारिकाच्या घरी जाऊन त्रास देत होता. त्यामुळे या सर्व त्रासाला सारिका कंटाळली होती.