रत्नागिरी : मागील आठवड्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भास्कर जाधव यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाने आपली सुरक्षा जाणूनबुजून काढून घेतल्याचा आरोप केला होता. ही सुरक्षा काढून घेतल्यानंतर आपल्या घरावर हल्ला झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव यांना आता मावळचे शिवभक्त बाबाराजे देशमुख यांचे सुरक्षाकवच मिळणार आहे. याबाबत स्वतः भास्कर जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली. 

काय म्हणाले भास्कर जाधव...

मावळ येथील कट्टर शिवभक्त बाबाराजे देशमुख आज मला भेटायला आले होते. एकीकडे शासनाने माझे संरक्षण काढून घेतले आणि दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भेटायला आलेल्या बाबाराजे यांनी मला सांगितलं, "तुम्ही बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरा आणि राज्यभर तुमच्या भाषणांचा सुरू असलेला धडाका असाच चालू राहू द्या, संरक्षणाची चिंता करू नका. जिथे जाल तिथे तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ..!!"

बाबाराजे, आपण अत्यंत आपुलकीच्या नात्याने भेटून मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार !!