रत्नागिरी : दोन वर्षांच्या कोरोना काळातील बंद झालेली एसटीची सार्वजनिक वाहतूक आणि त्यानंतरच्या एसटी कर्मचाऱ्याच्या ५ महिन्याच्या संपातून सावरत यंदाच्या गणेशोत्सवात एसटीला सुमारे ५ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा बंदचा मोठा फटका महामंडळाला बसला आहे. एसटीचे नियमित असलेल्या प्रवाशांनी त्या काळात अन्य पर्याय निवडल्याने एसटीचे हे २० टक्के प्रवासी कायमचे तुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मात्र एसटीला मोठा हात दिला तो यंदाच्या गणेशोत्सवाने. दोन वर्षानंतर गणेशभक्त श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गावाकडे येणार होते. त्यामुळे एसटीने त्याचे योग्य नियोजन केले. गणेश चतुर्थीपूर्वी एसटीच्या १ हजार ५८० फेऱ्या सुरू होत्या. ६ लाख २१ हजार किमीच्या या फेऱ्या झाल्या. ७५ हजार प्रवासी एसटीने जिल्ह्यात आणले. यातून २ कोटी ६० लाखांचे उत्पन्न एसटीला मिळाले तर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी १ हजार ८०० फेऱ्या सोडण्यात आल्या. सव्वासहा लाख किमीच्या फेऱ्या झाल्या. ८० हजार चाकरमान्यांची वाहतूक एसटीने केली. यातून २ कोटी ७५ लाख एवढे उत्पन्न मिळाले. यंदाच्या गणेशोत्सवात ५ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाल्याने एसटीला सावरण्यास मोठी मदत झाली.