सोलापूर- आ. सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन अतिवृष्टी झालेल्या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासह शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध विषयांवर चर्चा करून ते विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. 

 यावेळी आ. देशमुख यांनी मंद्रुप येथे एम. आय. डी. सी. सुरू करणे, तिऱ्हे येथे आरोग्य उपकेंद्र जागा उपलब्ध करून देणे, उद्योग भवन उभारण्यासाठी बैठक लावावी , होटगी तलाव जागेला जलसंपदा विभागाचे नाव लावावे , मंद्रुप अप्पर तहसिल कार्यालय येथे कार्मचारी कमतरता आहे तिथे कर्मचारी वाढवणे, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या सर्व महसुल विभागातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे, हद्दवाढ भागातील जि. प. शाळा महानगरपालिकेला वर्ग करणे , कुडल, हत्तरसंग पर्यटन स्थळ दर्जा मिळावा , म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन उपकेंद्रास जागा मिळावी , आनंदराव देवकते यांचे स्मारक उभारावे यासह विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.