पूर्णा(प्रतिनिधी)तालुक्यतील शेतकऱ्यांचा मोर्चा आज सोमवारी (दि.१९) दुपारी पूर्णा तहसील कार्यालयावर धडकताच प्रशासनाची एकच धांदल उडाली. पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. तालुक्यातील सरसगट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तात्काळ २५% अग्रीम पिकविमा द्यावा, सन २०१९- २० चा मंजूर झालेला परंतु प्रलंबित असलेला पिक विमा तात्काळ द्यावा आदी मागण्या घेऊन पूर्णा तहसिलवर बैलगाडी मोर्चा काढला जाणार होता. परंतु लम्पी आजारामुळे बैलगाडी मोर्चा ऐवजी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून पायी मोर्चा काढला.सकाळ पासूनच शेतकरी बांधव ताडकळस टी पॉईंट येथे जमण्यास सुरूवात झाली होती. शेतकऱ्यांची मोठी संख्या व शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता पूर्णा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अग्निशामक दलाची गाडी ही तहसील बाहेर तैनात करण्यात आली होती. जय जवान.. जय किसान..पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे.सरसगट पिकविमा मिळालाच पाहिजे.पिकविमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आदी घोषणांनी तहसील परिसर यावेळी दुमदुमून गेला. या घोषणांमधून राज्य शासन व कृषिमंत्र्यांवरही रोष व्यक्त केल्याचे दिसून येत होते. अतिशय आक्रमक परंतु शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा निघाला होता. शेतकरी आंदोलकांच्या वतीने नायब तहसीलदार यांना तालुका प्रशासनास निवेदन व वाळलेल्या सोयाबीनचे धान देण्यात आले.यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर गैरहजर असल्याने आंदोलकात रोष पहावयास मिळाला.पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करीत, घरातील दागिने मोडून, गहाण ठेवून, कर्ज घेऊन ते शेतीसाठी व पिकविम्यासाठी खर्च करूनही पदरात मात्र काहीच नाही अशी कळकळ शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. मोर्चास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चासाठी हजारो शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन एकत्र करण्याचे काम प्रहारचे उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के,श्रीहरी इंगोले,गंगाप्रसाद वळसे,गंगाधर इंगोले,मंचक कुर्हे, नामदेव कदम, नितीन कदम यांनी परिश्रम घेतले. मोर्चात मंचक राव जोगदंड, गजानन सवराते, शिवाजी भालेराव नागनाथ गुंडाळे, ऍड.अमोल पळसकर, नवनाथ पारवे संतोष पारवे, चंद्रकांत कऱ्हाळे, रितेश काळे, श्रीधर पारवे, अशिष जोगदंड, राज ठाकर, गंगाधर इंगोले बाबन ढोणे , नितीन कदम, नारायण सोनटक्के,निलेश जोगदंड, अनिल बुचाले,नवनाथ चेपेले, सैनाजी माठे, राजेश खंदारे, गजानन खंदारे, शेख मगदूम नासिर शेख गजानन खंदारे नाना आवरगंड, किसन जोगदंड, ज्ञानोबा मोरे सहभागी झाले होते. या मोर्चास पूर्णा तालुक्यातील सत्ताधारी पक्ष वगळता सर्व पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला तसेंच परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले होते.