राजगुरुनगर शहरांतर्गत वाहतूक कोंडीच्या समस्येने प्रशासनाला जोरदार चपराक बसली. कारण वाडा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, कोंडीत सापडलेल्या आमदार दिलीप मोहिते यांनाच रस्त्यावर उतरून कोंडी सोडवावी लागली.

सकाळी अकराच्या सुमारास आमदार एका कार्यक्रमासाठी निघाले असताना पंचायत समिती चौकातील वाहतूक कोंडीत त्यांची गाडी अडकली. अर्ध्या तासानेही गाडी निघेना, म्हणून ते गाडीतून खाली उतरले आणि कोंडी सोडविण्यासाठी स्वतः चौकात उभे राहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे अंगरक्षक पोलिस अधिकारीही खाली उतरले. काही कार्यकर्तेही मदतीला आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

वाडा रस्त्यावर पंचायत समिती चौक परिसरात असलेल्या टपऱ्या हातगाड्या आणि रस्त्यावरील पार्किंगमुळे या वाहतूककोंडीत अधिक भर पडते. अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्याही तिथेच उभ्या असतात. चौकालगत महात्मा गांधी विद्यालय आहे. तिथे मुलांना न्यायला येणाऱ्या पालकांची वर्दळ असते. त्यांना वाहतूक कोंडीतून कसरत करीत पाल्याला बाहेर काढावे लागते. ही रोजची समस्या असूनही नगरपरिषद, महसूल व पोलिस प्रशासन ती सोडवण्यासाठी काहीही ठोस उपाययोजना करीत नाही. प्रशासन ढिम्म आहे. त्याचा फटका खुद्द आमदारानांच बसला. म्हणून त्यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावर उभे राहावे लागले.