सोलापूर- आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर महापालिकेने आसरा येथील रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणासह अनेक मागण्या केल्या होत्या अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.

आसरा पूल येथील रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. महापालिकेने हे खड्डे बुडवण्यासाठी मुरूम टाकला होता. मात्र त्यामुळे अधिकच धूळ उडत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत अनेक संघटना आणि नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा आणि शहरातील इतर रस्त्यावरीलही खड्डे बुजवावे अशा सूचना केल्या होत्या. आ.देशमुख यांनी वारंवार आयुक्तांनाही याबाबत सांगितले होते. अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आसरा पुलासह शहरातील इतर रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 

उड्डाणपुलाचे कामही लवकर सुरू होईल: आमदार देशमुख

आसरा पूल येथे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आमदार देशमुख यांनी येथे उड्डाण पुलाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची त्यानुसार गडकरी यांनी 28 कोटीचा निधी देत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे लवकरच उड्डाणपुलाचे कामही सुरू होईल असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.