शिरूर :मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात असून पुणेकरांनी आरक्षणाचा अंतिम टप्प्यातील लढाईसाठी मोठ्या संख्येने मुंबईत यावे व मराठा  समाजाने  आपल्यातील  एकजूट कायम ठेवावी असे आवाहन करत मराठाना ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची आग्रही मागणी असल्याचे मराठा आरक्षण क्रांती योद्धे मनोज जरांगे यांनी शिरूर येथे सांगितले. आंतरवेली सराटी येथून मनोज जरांगे येथून मुंबई येथे मराठा आरक्षणाचा मागणीसाठी निघाले असून त्याचे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सतराकमानीचा पुलाजवळ भव्य असे स्वागत करण्यात आले. मोठ्या क्रेन द्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती त्यांनी केली. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की समाजाचा प्रगतीसाठी व लेकरांच्या भविष्यासाठी शहाणपणाची भूमिका घ्यावी लागेल. आपले शरीर सुध्दा साथ देत नसताना जातीसाठी ,समाजासाठी जीवांची ही पर्वा न करता आंदोलन करत आहे. मराठ्यांचा ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना शासनाने ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावे . शेवटच्या मराठाला आरक्षण मिळे पर्यत आपण हटणार नाही. लेकराच्या साठीची ही लढाई आहे . आरक्षण अंतिम टप्प्यात असून ही संधी सोडू नका .आपल्यातील एकजूट कायम ठेवा असे ते म्हणाले. मराठे एकत्र आले तर ही जात प्रगत होईल व कोण्यापुढे हात पसरण्याची वेळ ही येणार नाही असे ते म्हणाले. आरक्षणाने लेकरांचे आयुष्यभराचे कल्याण होईल. मुंबईतील आंदोलनाचा वेळी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने मुंबईत दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतक्या वर्षात जाणूनबुजून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू दिला नाही. मराठा एक होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. आता मात्र समाज एकजूट होत आहे. आंतरवेली मधून निघाल्या पासून विविध गावांतील लोक रात्रीचे ही जागून ठिकठीकाणी स्वागत करत आहे. शासनाने या लोकांच्या वेदना जाणून घेवून भानावर यावे असे ते म्हणाले. शांततेत मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन केल्याने आरक्षणाचा विषय निर्णायक टप्प्यावर आला असून आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई वरून परत येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. जरांगे यांनी नाव न घेता  एका मंत्र्यावर टीका केली. शिरूर नंतर जरांगे हे मुक्काम असणा-या कारेगाव येथे मुक्काम स्थळी पोहोचले. रात्री उशीरा त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जरांगे यांच्या समवेत असणा-या आंदोलनकर्त्यांची ठिकठिकाणी भोजन व अल्पोहाराची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थ व विविध संस्था संघटना यांनी केली होती . फोटो मनोज जरांगे शिरुर येथे संवाद साधताना .