आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 07 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवू शकतात. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.