राजापूर : कोरोना कालावधीमध्ये बंद करण्यात आलेली राजापूर-आंगले एसटी फेरी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आंगले, गोठणे, दोनिवडे येथील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

कोरोना महामारीपूर्वी राजापूर आगारातून सकाळ व दुपारच्या सत्रात राजापूर-आंगले एसटी फेरी सुरू होती. मात्र कोरोना कालावधीमध्ये ही फेरी बंद करण्यात आली. या फेरीमुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची पायपीट दूर झाली होती. ही फेरी बंद करण्यात आली असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सकाळच्या सत्रात भरणाऱ्या राजापुरातील कनिष्ठ महाविद्यालय व हातिवले येथील महाविद्यालयामध्ये येण्याकरिता आंगले येथील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सुमारे दोन ते अडीच किमी पायपीट करून गोठणे दोनिवडे येथील थांबा गाठावा लागत आहे. काहीवेळा या मार्गावरून धावणारी फेरी चुकल्यास खासगी वाहनांचा आधार घेऊन राजापूर शहर गाठावे लागत आहे. तसेच सकाळच्या सत्रात गोठणे दोनिवडे मार्गे राजापूरला येण्याकरिता एकच फेरी असल्याने कायम गर्दी होत आहे. त्यामुळे पुढील थांब्यावरील प्रवाशांना न घेताच फेरी निघून जात आहे.

यामुळे राजापूर-आंगले फेरीचा चांगला फायदा होत असून भारमानही चांगले मिळत होते. त्यामुळे या फेरीची आवश्यकता असून ही फेरी पूर्ववत सुरू करावी. ही फेरी रेल्वेस्टेशनपर्यंत करावी. त्यामुळे रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या प्रवाशांची व राजापूरला येणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.