चिपळूण: शांत रत्नागिरी जिल्हा आता अशांतच्या दिशेने जाताना दिसत आहे. नेहमी खून, चोऱ्या, मारमारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड घबराट पसरली आहे. नुकतीच चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेवर ऍसिड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना अज्ञातांनी तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिला घरामध्ये एकटी असतानाच अज्ञातांनी तिचा खून केला आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे.

कुलसूम अन्सारी असं मृत महिलेचे नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्याने खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केलं आहे. दरम्यान मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई फोन उचलत नव्हती. त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितले. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. आज मंगळवारी सकाळी या महिलेचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथील कब्रस्थानात करण्यात आला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी खरा खुनी कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.