जेष्ठ पत्रकार श्रीकांत भराडे यांचे निधन

औरंगाबाद : 

ज्येष्ठ पत्रकार, ललित लेखक, कवी व नाटककर श्रीकांत भराडे (रा. कॅनॉट प्लेस, वय ६७) यांचे आज रात्री आठच्या सुमारास औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, दोन बहिणी, मुलगा चैतन्य, मुलगी तृप्ती, नातू असा आप्त परिवार आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड येथे श्रीकांत भराडे यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय विभागात वृत्तसंपादकापर्यंतच्या विविध जवाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. ‘पाय हरवलेली माणसं’ हा त्यांचा ललित लेख संग्रह चांगलाच गाजला होता. या ग्रंथास अस्मितादर्श पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘आणीबाणीनं पाजलं पाणी’ या नाटकाने, काळा आर्य या काव्यसंग्रहाने व दटके या कादंबरीने श्रीकांत भराडे यांना साहित्यिक म्हणून ओळख दिली. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला लिखाणाला प्राधान्य दिले होते.२३ जुलै रोजी भराडे यांना एशियन हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर कॅन्सर हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु झाले. फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे व त्याचा संसर्ग वाढल्यामुळे आज रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. परभणी या मूळ गावी भराडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.