औरंगाबाद : पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याच्या वादातून एकावर गावठी कट्ट्यातुन गोळी झाडून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपूंजीतील कमळापूर भागात घडली. सागर सुभाष सदर (वय अंदाजे २५, रा. हनुमान नगर कमळापूर) असे गोळी लागून जखमी झालेल्याचे नाव आहे. कमळापूर भागातील हनुमान नगर परिसरातील सागर सदर या तरूणाला त्याच भागातील गजा मोरे याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. या गोळीबारात सागर यांच्या उजव्या बरगडीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गजा मोरे याचे बहिणीने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. दरम्यान सागर याने चुकीची साक्ष दिली. या कारणावरून गजा मोरे याने शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गजा याने सागरला कमळापूर फाट्यावर अडवले. यावेळी गजाचे चार ते पाच साथीदार आणि सागर यांच्यात वाद झाले. हा वाद विकोपाला गेल्याने गजा मोरे याच्यासोबतच्या साथीदारांनी सागरवर तलवारीने वार केले. ते चूकवतांना सागर हा जमीनीवर कोसळला. याचवेळी गजा याने सागर यांच्यावर गावठी कट्ट्यातुन सुमारे चार ते पाच गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सागरच्या उजव्या बरगडीत लागली. यावेळी सागर हा गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी उपचारार्थ तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान एवढी मोठी खळबळ उडवणारी घटना घडल्यानंतरही याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिसांना साधी खबरही नव्हती