वाघाच्या बंदोबस्तासाठी गडचिरोली जिल्हयात रॅपिड रिस्पॉन्स टीम (आर .आर .टी) स्थापन करा.

आमदार डॉ देवरावजी होळी

आमदार महोदयांनी घेतली गडचिरोलीचे उप वनसंरक्षक मिलिश शर्मा याची भेट घेऊन केली चर्चा

हल्यातील मृतकाच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळावी याकरिता केली सूचना

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे कडे मागणी लावून धरणार

गडचिरोली  दि02 :-  मागील २वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाचा धुमाकूळ सुरू असून वाघाच्या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. मात्र वाघाचा बंदोबस्त लावण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आपल्या जिल्ह्यात नसल्याने ताडोबा व इतर जिल्ह्यात असणाऱ्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (आर आर टी) गडचिरोली जिल्ह्यातही स्थापन करून त्या माध्यमातून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.मागील आठवड्यात मृत्युमुखी पावलेल्या मृतकांच्या परिवाराला तातडीने आर्थिक मदत मिळावी व वाघाचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा याकरिता आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोलीचे उपवनसंरक्षक श्री मिलीश शर्मा यांची त्यांच्या वनविभाग कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर उपस्थित होते.

मागील २ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघाने जवळपास ३५ हून अधिक निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे. ७० टक्के जंगलाचे प्रमाण असलेल्या या जिल्ह्यामध्ये वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये वाघाला पकडण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. ज्या प्रकारे ताडोबामध्ये एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला तर त्या ठिकाणी त्या वाघाला पकडण्यासाठी ताबडतोब रॅपिड रिस्पॉन्स टीम (आर आर टी ) यंत्रणा कामाला लागते . व त्या पद्धतीने वाघाचा बंदोबस्त केला जातो. तशी आपल्याकडे रॅपिड रिस्पॉन्स टीम (आर आर टी ) ही यंत्रणा नाही . परिणामी आपल्या जिल्ह्यात वाघाला पकडण्यासाठी ताडोबाची टिम किंवा इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागते . त्यात फार कालावधी जातो . त्यामुळे अशी यंत्रणा आपल्या जिल्ह्यात उपलब्ध झाल्यास वाघाला तातडीने पकडणे, त्याचा बंदोबस्त करणे शक्य होईल . करिता अशा रॅपिड रिस्पॉन्स टीमची तातडीने स्थापना करून गडचिरोली येथे अशी टीम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.