जिंतूर: तालुक्यातील येलदरी जलाशयावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी, आज (सोमवारी) जिंतूर सेलू मतदार संघाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तहसील कार्यालयावर मच्छीमार बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. येलदरी जलाशयात मच्छीमारांनी पकडलेले गावरान मासे कमिशन बेसवर देण्यात यावी, मच्छीमारांना स्वर्गीय राजीव गांधी मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेचे सभासद करून घ्यावे, परप्रांतीयांना मासेमारी करण्या#साठी बंदी घालण्यात यावी,संस्थेचे बोगस पदाधिकारी निलंबित करून सदर संस्था काळ्या यादीत करण्यात यावी, तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मच्छीमारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमाऱ्यांच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या अगोदर 1 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कोलपा येथे मच्छीमारांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनाची प्रशासनाकडून कसलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मच्छीमार बांधवांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शहरातील नरसिंह चौक, दादा शरीफ चौक, मुख्य चौक, बाजार चौक, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक ते तहसील कार्यालय या मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला.तहसील कार्यालय परिसरात माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मोर्चेकरांना संबोधित केले. यावेळी जिंतूर तहसीलदारांमार्फत मच्छीमारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले. या मोर्चामध्ये जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अजय चौधरी, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वनाथ राठोड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज थिटे, राष्ट्रवादीचे सेनगाव तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे, पंचायत समिती माजी सभापती गणेशराव ईलग, माजी नगराध्यक्ष साबिया बेगम फारुकी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब घुगे, मुरली मते, विठ्ठल घोगरे, अभिनय राऊत, शरद मस्के, शरद अंभोरे, करून नागरे, शिवाजी राठोड, विजय खिस्ते यांच्यासह तालुक्यातील मच्छीमार बांधव तसेच महिला मुलाबाळांसह सहभागी झाल्या होते.