महात्मा गांधींच्या चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात ब्रिटीश सरकारने चिरनेर ग्रामस्थांवर , सत्याग्रहीवर अन्याय करत त्यांच्यावर गोळीबार केली. या गोळीबारात 8 नागरिक हुतात्मे झाले. या हुतात्म्यां मूळेच आज देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे.त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्‌यात चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे महत्वाचे योगदान आहे असे मत माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी चिरनेर येथे व्यक्त केले.

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर येथे श्री गणपती मंदिर येथील कै. नाना पाटील सभागृह येथे ऐतिहासिक चिरनेर गावातील जंगल सत्याग्रहाचा 92 वा स्मृतीदिन मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अनंत गिते बोलत होते.

यावेळी अनंत गीते यांनी सांगीतले की 1857 साली स्वातंत्र्यासाठी पहिला बंड झाला. त्यानंतर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1857 ते 1947 या कालावधी दरम्यान उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. याची नोंद इतिहासात आहे. या सर्वांचे स्मरण सर्वांनी ठेवणे आपले कर्तव्य आहे. या हुतात्म्यांचे देशासाठी खूपच मोलाचे योगदान आहे. असे सांगत जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे महत्व अनंत गीते यांनी अधोरेखित केले.

सर्वप्रथम पोलिस प्रशासन, शासकीय कर्मचारी, हुतात्मेचे नातेवाईक परिवार,लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ, समाजसेवक यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना बंदुकांच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ज्या हुतात्म्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्या हुतात्म्यांच्या नातेवाईकांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

 यंदा चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री व अवजड उद्योग मंत्री अनंत गीते,आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर शेठ भोईर,उद्योगपती पी पी खारपाटील, शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत पाटील, राजीपचे सदस्य बाजीराव परदेशी, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत,उरण पंचायत समितीच्या सभापती समिधा म्हात्रे,उरण पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर,उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण सुनील पाटिल,महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव, उद्योगपती राजेंद्र शेठ खारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी, सदस्य किरण कुंभार,नमस्ते मोकल, किशोर भगत, रमेश फोफेरकर, संतोष कातकरी, धनेश ठाकूर,धर्मेंद्र म्हात्रे, शितल घबाडी, संध्या ठाकूर,सविता केणी, नीता पवार, विनंती फुंडेकर, संध्या नारंगीकर,प्रतीक्षा मोकल,ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांनी केले.