औरंगाबाद :मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये पोहचले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले.मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी आपले रक्त सांडणाऱ्या वीरांना अभिवादन केले. तर मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'रझाकारांच्या कचाट्यातून मराठवाडा मुक्त करुन जनतेला स्वातंत्र्याची पहाट अनुभवयाला देणाऱ्या वीरांचे जनतेच्या वतीने आभार मानतो. तर मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढू असे आश्वासन देत त्यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी 12000 कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिने मराठवाड्यातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. दरम्यान, 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. त्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमध्ये औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी, पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार, जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार, मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प.जालना पाणीपुरवठा नूतनीकरण, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार, लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद, मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता, या घोषणांचा समावेश आहे.