पाथरी(प्रतिनिधी) शबॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने 2 री आमंत्रित 12 वर्ष मुले, मुली व खुला गट पुरुष,महिला जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धा 2022 चे आयोजन शांताबाई नखाते विद्यालय शिवाजी नगर पाथरी येथे दिनांक 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी करण्यात आले होते.

     वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित, शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभा प्रसंगी अध्यक्षीयस्थानी परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या नखाते तर या स्पर्धेचे उदघाटन बीड जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे सचिव राजेंद्र डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलिस स्टेशन पाथरीचे पोलिस उपनिरीक्षक के.जी तुरनर, बीट जमादार तथा राष्ट्रीय खेळाडू सुरेश कदम, परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे सचिव भरत घांडगे,शांताबाई नखाते प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यादव एन. ई., शांताबाई नखाते विद्यालय पाथरी चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य किशन डहाळे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दिलीप सुरवसे, परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम शेळके आदी उपस्थित होते.

     या जिल्हा स्तरीय निवड चाचणीमध्ये परभणी जिल्ह्यातील 41 संघांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी सहभागी संघाचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते.या निवड चाचणी स्पर्धेमधून वेगवेगळ्या संघातून प्रत्येक वयोगटात प्रत्येकी 14 खेळाडूंची निवड करण्यात आली असून हा संघ बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने 2 -या आमंत्रित राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर 2022 रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन चे उपाध्यक्ष तुकाराम शेळके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. बालासाहेब गायकवाड यांनी केले.

    या कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी धनंजय नखाते, राहुल घांडगे, रामा शहाणे, माऊली सुरवसे, सहदेव पुरी, व प्रस्तुत विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

🟨 खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होतो - अजिंक्यभैया नखाते

    शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडे लक्ष्य देणे आवश्यक आहे त्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो तसेच खेळ खेळल्यामुळे सांघिक भावना तयार होऊन खेळाडूंमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होतो असे वक्तव्य अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अजिंक्यभैया नखाते यांनी केले.