गेली दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पाला भक्तांनी मोठ्या उत्साहात निरोप दिला.हवेलीतील आळंदी म्हातोबा येथील मयूर मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले.कसल्याही ध्वनी प्रदुषणाशिवाय ही मिरवणूक काढण्यात आली अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष करण वाल्हेकर व उपाध्यक्ष निलेश क्षीरसागर यांनी दिली. कोरोना काळात प्रतिबंध असल्याने हा उत्सव होऊ शकला नाही त्यामुळेच दोन वर्षांनी आलेला हा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.अनेक ठिकाणी विसर्जनासाठी ढोल पथक, कर्णकर्कश आवाजातील डी.जे लावण्यात येतात प्रचंड ध्वनिप्रदूषण असते परंतु या सर्वांना फाटा देत मयूर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारकरी संप्रदायातील आषाढी वारी ही संकल्पना राबविली.यासाठी आळंदी (देवाची) येथील अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष हभप चेतन महाराज शास्त्री यांचे सहकार्य घेऊन हा मिरवणूक सोहळा टाळ मृदुंगाच्या तालावर संताच्या अभंगाच्या गायनातून मानाच्या पालखीमधून श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली.बाल वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या सहाय्याने विविध प्रकारचे वारकरी खेळ सादर करून मिरवणुकीला आषाढी वारीचा रंग आणला.गावातील महिला,तरुण,वृध्द वर्गाने या वारीत फुगड्या खेळून आनंद लुटला व आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.