काल रात्रीपासून वीजेचा खोळंबा; नागरिकांना होणाऱा त्रास सहन केला जाणार नाही

परळी । दिनांक ०४। शहरातील वीज पुरवठा काल रात्रीपासून गायब झाल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत, ऐन सणासुदीत वीज गुल झाल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सकाळी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत झापले. तातडीने पुरवठा सुरू करा, नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही असे सांगितल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घेऊन वीज पुरवठा सुरळीत सुरू केला.

गणेशोत्सव आणि महालक्ष्मीचा सण असल्याने सर्व घरांमध्ये धामधूम आहे. अशातच काल रात्रीपासून शहरातील वीज अचानक खंडित झाली. महालक्ष्मीची आरास, सजावट, देखावा, गणेशाची पूजा, आरती करताना वीज खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. रात्रीपासून गेलेली वीज आज दुपारी 12 वा.पर्यंत देखील सुरू झाली नव्हती , त्यामुळे त्रासात अधिकच भर पडली. 

हा सर्व प्रकार कानावर जाताच पंकजाताई मुंडे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना धारेवर धरले. ऐन सणासुदीत नागरिकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही, असा कडक शब्दांत इशारा दिल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि दुपारी 12.30 वा. नंतर वीज पुरवठा सुरळीत केला. पंकजाताईंनी वीज लपंडावाच्या त्रासातून सुटका केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.