बैलपोळ्या निमित्त बैलावरील राजकीय घोषवाक्यांनी ग्रामीण भागात चर्चेला उधाण

पाचोड/ पैठण तालुक्यातील विविध गावामध्ये कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वादानंतर विधानभवनासह राज्यभरात “५० खोके माजले बोके "ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी" अशा प्रसिद्ध झालेल्या घोषवाक्य आता बैलपोळा निमित्त ग्रामीण भागातील पोहोचल्याचे चित्र विहामांडवा येथे शुक्रवारी (दि. २६) रोजी सायंकाळी पाहायला मिळाले.

या पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पोळा सण शांततेत साजरा केला आहे. या पोळ्यामध्ये नागरिकांच्या देखाव्यासाठी आकर्षण ठरलेल्या विहामांडवा येथील शेतकरी अस्लम शेख यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदविण्याचे घोषवाक्य आपल्या बैलावर लिहून गावात वाजत गाजत '५० खोके, माजले बोके, ईडी ज्यांच्या घरी तो भाजपच्या दारी' असे घोषवाक्य बैलांच्यावर लिहुन मिरवणूक काढल्यामुळे विहामांडवा पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आजचा दिवस यानिमित्ताने चर्चा ठरला होता.