वटवृक्ष मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्नता पाहून भारावलो आ.शहाजी बापू पाटील

अक्कलकोट : - आज जवळपास ११ वर्षानंतर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आहे. या मोठ्या कालावधीनंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज बरेच बदल आपणास पहावयास मिळाले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मोठ्या तळमळीने मंदिरात विविध बदल घडवून भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शनाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. येथील गाभाऱ्यातील नयनरम्य नूतनीकरण असो, मंदिर परिसरातील सुशोभीकरण असो वा स्वामी समर्थांची प्रसन्न भावमुद्रा हे सर्व पाहिल्यानंतर मनाला अत्यंत प्रसन्नता लाभत आहे. त्यामुळे निश्चितच भाविकांनाही प्रसन्न चित्ताने स्वामी दर्शन घेण्याचा लाभ होईल असे मनोगत सांगोला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते.

यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संतोष पराणे, अविनाश मडीखांबे, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, चित्तरंजन अगरथडे, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, संजय पवार, प्रसाद सोनार, सागर गोडाळ, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी, संजय काजळे, हेमंत लोमटे, अमीत काळे इत्यादी उपस्थित होते.

'काय ते डोंगर, काय ते झाडी, काय ते हाटील' या शहाजी बापू पाटीलांच्या प्रसिद्ध झालेल्या त्यांच्याच वाक्याच्या अंदाजात त्यांनी जाता जाता 'काय ते महातपस्वी स्वामी समर्थ, काय ते वटवृक्ष मंदीर, काय ते मंदीर समितीचे कार्य' इथलं काम सर्व काही एकदम ओके असल्याचे तोंडी प्रशस्ती पत्रही त्यांनी महेश इंगळेंसह मंदीर समितीला दिले.