आदर्श पतसंस्था १०१ शाखेपर्यंत भरारी घेवो:रोहयोमंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे प्रतिपादन

पाचोड येथे संस्थेच्या नूतन शाखेचे थाटात उदघाटन ;संस्थेची ही ४२वी शाखा"

पाचोड (विजय चिडे)

जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे असताना आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने आपले वेगळे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. विविध योजना, कुशल कर्मचारीवर्ग, पारदर्शक व तत्पर सेवा यासोबतच अध्यक्ष सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील यांची प्रेरणा आणि सक्षम संचालक मंडळाचे मार्गदर्शन यामुळे आदर्श पतसंस्था दिवसेंदिवस प्रगती साध्य करत आहे. या बळावरच आज संस्थेने ४२ शाखांपर्यंत मजल मारली आहे. लवकरच संस्था १०१ शाखेपर्यंत भरारी घेवो असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संदीपान भुमरे यांनी केले.

पैठण तालुक्यातील पाचोड येथे आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उदघाटन रविवार, २२ जानेवारी रोजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेची ही ४२वी शाखा आहे. याप्रसंगी धूपखेडा साईसाधनाश्रमचे संस्थापक स्वामी बलदेवजी भारती महाराज, आदर्श उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकाररत्न अंबादासराव मानकापे पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र देशमुख, सचिव अशोक काकडे, संचालक भाऊसाहेब मोगल, काकासाहेब काकडे, त्रिंबक पठाडे, रामसिंग जाधव, प्रमिला जैस्वाल, ललिता मुन, रुपाली शेंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पूजन करण्यात आले. तद्नंतर फीत कापून शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मानकापे पाटील यांनी ना. संदीपान भुमरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी इतर मान्यवरांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य व्यवस्थापक पंडित बाजीराव कवठे यांनी केले. यात त्यांनी संस्थेचा विकास आढावा उपस्थितांसमोर मांडला. तर अध्यक्ष मानकापे पाटील यांनी सभासदांचे आभार मानले. स्थापनेच्या १९ वर्षांच्या कालावधीत सभासद, ठेवीदार यांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळेच आज संस्था भरीव प्रगती साध्य करू शकली आहे. संस्थेच्या ठेवींमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. भविष्यातही हे सहकार्य असेच द्विगुणित होत राहील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली तसेच अधिकाधिक प्रमाणात नागरिकांनी आपल्या ठेवी संस्थेकडे ठेवाव्यात असे आवाहन केले. ह्या ठेवी संस्थेकडे पूर्णपणे सुरक्षित राहतील अशी ग्वाहीही मानकापे पाटील यांनी उपस्थितांना दिली. यावेळी स्वामी बलदेवजी भारती महाराज यांनीही मानकापे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला आपल्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी पैठण मा आ संजय वाघचौरे, कृउबास पैठण सभापती राजूनाना पा भुमरे, पाचोड सरपंच शिवराज पा भुमरे, मा स जि प जालना बप्पासाहेब गोल्डे, ख वि संघ अंबडचे भाऊसाहेब पा कनके, पाहोड उपसरपंच शिवाजी भालसिंगे, भाजप पैठण मा ता अध्यक्ष राजेंद्र पा भांड, रा काँ युवानेते विलास प शेळके, मा जि प उपाध्यक्ष बद्रीनारायण पा भुमरे, ख वि संघ पैठण चेअरमन बाबुराव पा. पडुळे, रा. काँ. पैठण तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पा निर्मळ, मा. नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. सुनील पा शिंदे, औ जि मराठी पत्रकार संघ अध्यक्ष हबीबखान पठाण, गटसचिव इंगळे, सिद्धेश्वर अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन भागवत डुकरे, सावळेश्वर अर्बन ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन ज्ञानेश्वर उडदंगे, अन्नपूर्णेश्वर अर्बन कॉपरेटिव सोसायटी लिमिटेडचे चेअरमन काकासाहेब थोटे, सह्याद्री अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे चेअरमन रवींद्र आगळे, आदिनाथ अर्बन कॉपरेटिव सोसायटी लिमिटेडचे चेअरमन अमोल गाडेकर, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद शाखा पाचोड येथील शाखा व्यवस्थापक अशोक ठोंबरे, शाम तांगडे, अनिल हजारे, राजेंद्र वाघामोडे, सुनिल इंगळे, प्रल्हाद मापारी, रवींद्र कारके यांच्यासह पंचक्रोषीतील व्यापारी, शेतकरी व विविध स्तरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्य व्यवस्थापक पंडित कवठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोड शाखा व्यवस्थापक गोकुळ नवथर, विहामांडवा शाखा व्यवस्थापक गजानन थोटे, लिपीक सुमित इंगळे, कर्मचारी राजू भांड, पत्रकार कैलास सातपुते (विहामांडवा),पत्रकार विजय चिडे,संतराम कणके भांबेरी, भाऊसाहेब कणके भांबेरी, कॅशियर सचिन काळे, शिपाई कर्मचारी जितेंद्र कुलकर्णी, विलास काकडे व संस्थेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बॉक्स

आदर्श संस्थेचे कार्य कौतुकास्पद

आपल्या उदघाटनपर भाषणात ना. संदीपान भुमरे यांनी आदर्श संस्थेचे कौतुक केले. मंत्री भुमरे म्हणाले, जिल्ह्यात पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी पतसंस्था म्हणून आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे नाव घेतले जाते. या संस्थेच्या ४२ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा आज पाचोड येथे झाला याचा आनंद वाटतो. या संस्थेची ४२ वरून प्रगती करून लवकरच १०१ शाखा होवो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्याच्या विकासासाबाबत काहीही मदत लागली तर हक्काने सांगा असेही त्यांनी पुढे सांगितले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने जिल्हयातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकीक प्राप्त केला असल्याचे सांगून मानकापे पाटील यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. पाचोड व परिसरातील नागरिकांनी संस्थेच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन संस्थेला सहकार्य करावे असे आवाहनदेखील मंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी केले.

वर्षभरात धूपखेडा रस्ता पूर्ण होणार !

याप्रसंगी मानकापे पाटील व स्वामी बलदेवजी भारती महाराज यांनी धूपखेडा रस्ता बांधकामासंदर्भात मंत्री भुमरे यांना निवेदन देत साईभक्तांसाठी रस्ता करून देण्याची विनंती केली. यावर बोलताना मंत्री भुमरे म्हणाले, धूपखेडा रस्त्याचे काम आचारसंहिता संपल्यानंतर लगेच सुरु करणार आहोत. कौटगाव ते धूपखेडा, धूपखेडा ते दिन्नापूर आणि दिन्नापूर ते तोंडोळी या सर्व रस्त्यांची कामे यात होतील. यासाठी १३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ५० वर्षांनंतर प्रथमच इतका मोठा निधी या कामासाठी येत आहे. रस्त्याअभावी परराज्यातून येणारे भाविक परत माघारी फिरतात. मात्र आता असे होणार नाही. एका वर्षात हे काम पूर्णत्वास जाईल अशी ग्वाहीही मंत्री भुमरे यांनी यावेळी दिली.