रत्नागिरी,( वा.) सत्ताधारी पक्षातील काही राजकिय नेते शिवरायांबाबत वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत.काहीठिकाणी आपल्या सोयीच्या इतिहासाची मांडणी करून शिवरायांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो...हे दुर्दैवी असून अशी वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.छत्रपतींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षेसाठी विशेष कायदा राज्य सरकारने करावा अशी जाहीर मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या संघटने मार्फत करण्यात आली आहे.

सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी छत्रपतींबाबत चुकीची विधाने करण्याचा सपाटाच लावला आहे.अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारी चुकीची विधाने राज्य सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजेत.कोणाच्याही विधानाचे लंगडे समर्थन सरकार मधील जबाबदार व्यक्तीने करता कामा नये.हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने चालते असे म्हणणारे शिवरायांच्या बाबत केल्या जाणाऱ्या विधानावर गप्प कसे राहतात असा सवाल गाव विकास समितीने विचारला आहे.

सरकारने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन छत्रपतींचा अपमान करणारे,चुकीचा इतिहास सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे यांना शिक्षा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी गाव विकास समिती मार्फत करण्यात आली आहे.

 • छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना आता कायद्याचा धाक बसायला हवा.चुकीची वक्तव्य करणारे तुरुंगात गेल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही..महाराष्ट्र शासनाने विशेष कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा!

- सुहास खंडागळे,संघटन प्रमुख गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा