रत्नागिरी : समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी कार्यालयात दोन दिवसांपासून तोबा गर्दी उसळली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबर २०२० पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. मात्र जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समाज कल्याण विभाग रत्नागिरी येथे असून कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांपासून उमेदवारांनी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ही गर्दी समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे अशा जिल्हातील सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० यावेळेत मतदान प्रकिया पार पडणार आहे. निवडणूक अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा पावती आवश्यक असल्याने कागदपत्रे पडताळणीसाठी रत्नागिरी येथील समाज कल्याण विभागामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. समाज कल्याण विभागामधील कर्मचारी रिक्त पदे भरली जात नसल्याने याठिकाणी आलेल्या नागरिकांनी कार्यालयाच्या ढिसाळ नियाेजनाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान जात पडताळणीसाठी जिल्हाभरातून उमेदवार समाज कल्याण विभाग येथे येत आहेत. मात्र एका कामासाठी पूर्ण दिवस जात असल्याने समाज कल्याण विभागाच्या भाेंगळ कारभारावर अनेकांनी ताेंडसुख घेतले. उमेदवारांना अक्षरश: कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर दिवसभर बसावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निवडणूक आयोगामार्फत राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबरोबर समाज कल्याण विभागाने कोणतीही तत्परता दाखवली नसल्यानेच ही झुंबड उडालेली दिसत आहे. या गर्दीत दिवसभर उमेदवारांना ताटकळत उभ राहण्याची वेळ आली आहे. 

- उमेश सावंत