बीड: प्रेमात अडसर ठरणाऱ्या मामाच्या मुलीला प्रियकराच्या मदतीने विहीरीत ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी गावातील या घटनेने खळबळ उडाली. साक्षी ज्ञानोबा कदम (वय. 16)असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

कासारी गावात यात्रेसाठी परळी तालुक्यातील पाडोळी येथील वैष्णवी मनोहर काळे ही तिचे मामा ज्ञानोबा कदम यांच्या गावाकडे आली होती. ती मामाच्या गावाला गेल्याचे कळताच तिचा गावातील प्रियकर आकाश नागोराव तांबडे हा स्कॉर्पिओने कासारी गावात आला होता. वैष्णवी ही तिचे मामा ज्ञानोबा सोपान कदम यांच्याकडे यात्रेनंतरही थांबली होती.

वैष्णवीचा प्रियकर स्कॉर्पिओ घेऊन आला. वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला गावातून पळून जायचे होते. परंतु त्यांच्याबरोबर साक्षी असल्याने ती दोघांचे प्रेमप्रकरण नातेवाइकांना सांगेल या भीतीने दोघांनी दुपारी साक्षीला विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. परंतु साक्षी विरोध करत होती.

शेवटी दोघांनी जोराचा धक्का देऊन विहिरीत ढकलून दिले. यानंतर वैष्णवी व तिचा प्रियकर आकाश हा स्कॉर्पिओने गावातून पसार झाले. या प्रकरणी दोघा विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राला संपवल

पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राला संपवलं असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये खुनाचा हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत दोन जिवलग मित्र एका हॉटेलमध्ये सोबत दारू प्यायले यानंतर ते सोबतच घरी गेले. इथपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं. मात्र, पुढे जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं.

हॉटेलमध्ये सोबत दारु प्यायल्यानंतर ते घरी गेले आणि सोबतच जेवणही केलं. त्यानंतर यातील एका मित्राने पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्राच्या डोक्यात लोखंडी टॉमी घालून त्याची हत्या केली. फारुख खान इब्राहिम खान पठाण असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणात हत्या करणाऱ्या राजपूत पती-पत्नीला सिल्लोड पोलिसांनी घटनेनंतर 2 तासात अटक केली आहे.