औरंगाबादः संजय राऊत यांना जामीन झाला असून, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोण कुठून, कधी बाहेर आला आहे. कसा बाहेर आला आहे, ही बोलण्याची वेळ नाही. प्रत्येक वाघाला पिंजऱ्यात ठेवण्याची गरज नाही. राऊत हे वाघ आहे की नाही माहीत नाही, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानी संदर्भात बैठक घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्तार हे वादात सापडले होते. मुख्यमंत्री यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सत्तार यांनी माध्यमांशी राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. राऊत यांच्याबाबत मात्र ते बोलले.   राऊत यांना माझ्या शुभेच्छा आहे. पण ते वाघ आहे की नाही हे मला माहीत नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असं सांगत मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल, असे सत्तार म्हणाले.