रत्नागिरी : जिल्ह्याच्या समुद्रात गेल्या महिनाभरापासून निर्यात होणारी आणि चांगल्या चवीची पापलेट, सुरमई सोनेरी मासळी जाळ्यात सापडणे कमी झाले आहे. या माशांचे दरही वधारलेले असून, जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. मागील वर्षात उत्पादनात ६०० टनांची घट दिसून येत आहे.

जिल्ह्याला १६७ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मच्छीमारी उद्योगाला उपयुक्त अशी छोटी-मोठी ४६ मासळी उतरण्याची केंद्र किंवा बंदरे आहेत. जिल्ह्यात तीन हजार ९६१ मासेमारी नौका असून त्यात तीन हजार ५१९ यांत्रिकी नौका तर ४४२ बिगर यांत्रिकी नौका मासेमारी करतात; परंतू गेल्या महिन्याभरात या मच्छीमार नौकांना मासेमारी नौकेसाठी येणाऱ्या खर्चाइतकी मासळी मिळत नाही. यंदा हंगाम सुरु झाल्यानंतर बांगडा, कोळंबी बऱ्यापैकी मच्छीमारांच्या जाळ्यात सापडू लागली. ऑक्टोबरच्या प्रारंभी मासळी मिळण्याचे प्रमाण चांगले होते. गेल्या चार दिवसात दिवसात उष्मा जाणवू लागला आहे, तर राहिलेला नाही. थंडीचा जोर कमी होत आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम मासळीवर झाला असून मासा खोल समुद्राकडे किंवा पुढे सरकु लागला आहे. यंदा देशात सगळीकडेचे किनारपट्टीवर बांगडा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्याला रत्नागिरी जिल्हाही अपवाद राहिलेला नाही.

१०० ते १२० रुपये किलोने विकला जाणारा बांगडा सध्या ३० ते ४० रुपयांनी विकला जात आहे.. जिल्ह्याच्या किनारी भागात दर नसलेली उष्टी बांगडी मिळत आहे. ही मासळी फिशमील कंपन्यांसाठी उपयुक्त आहे. परंतू या मासळीलाही दरवर्षीप्रमाणे दर मिळत नाही. दक्षिणेकडील राज्यातून अशी मासळी जिल्ह्यातील फिशमील कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरला आहे. या परिस्थितीत पापलेट, सुरमईसारखी दर देणारी. मासळी कमी होत आहे. सध्या हा मासा वसई किनारपट्टीकडील भागात मिळत आहे. पालघर, ठाणे, रायगड या उत्तर कोकण परिसरात पापलेट मासा. सर्वाधिक मिळतो; परंतु तिकडेही तो कमी झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात मासा मिळत होता. पण सध्या तोही दुर्मिळ झाला आहे. सध्या १२०० रुपये किलोने पापलेट विकला जात आहे. सुरमईचा दर ६०० ते ७०० रुपये किलो आहे.