पुणे: पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवीन कात्रज बायपासजवळ विचित्र अपघात घडला. लक्झरी बस, कार आणि कंटेनर ट्रकसह 9 वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातात 15 जण जखमी झाले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस साताऱ्याच्या दिशेकडून मुंबई च्या दिशेने निघाली होती. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर दरी पुलावर हा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी पोहचले आणि त्यांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

कंटेनरला पाठीमागून बसने धडक दिल्याने बसमधील ८० टक्के प्रवासी जखमी झाले. बसमध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते याची माहिती मिळाली नसली तरी बस पूर्ण क्षमेतेने भरली असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. या अपघातात बसचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून बसच्या केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात कोणी जखमी नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अमरावतीत कुऱ्हा मार्गावर रिक्षाला ट्रकची धडक, 2 जणाचा मृत्यू दरम्यान, तिवसा ते कुऱ्हा मार्गावर वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी असून जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.