रत्नागिरी : जिल्हयातील विविध राजकीय पक्ष, विविध संघटना, वेगवेगळ्या घटकांतील नागरिक, त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलनात्मक कार्यक्रम रत्नागिरी जिल्हयात विविध ठिकाणी करीत असतात. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी जिल्ह्यात ०७ नोव्हेंबर ००.०१ ते दि. २१ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार, मा. जिल्हादंडाधिकारी यांना रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मनाई आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री पटल्याने मा. अपर जिल्हादंडाधिकारी यांनी ०७/११/२०२२ चे ००.०१ ते दि. २१/११/२०२२ चे २४.०० वा. पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्हयात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.

*या गोष्टी करण्यास मनाई*

१) शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सुरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.

२) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.

३) दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेउन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.

४) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर

सोंग करणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार

५) इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

६) सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. ७) पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित मनाई आहे.

*वरील प्रतिबंधात्मक आदेश हे खालील बाबींकरिता लागू होणार नाहीत*

१) अंत्ययात्रा.

२) धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी, ३) शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, ४) सार्वजनिक करमणूकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी.

नमूद प्रतिबंधात्मक कालावधीत कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचारसभेचे आयोजन करावयाचे असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या मनाई आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तरी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी दि. ०७/११/२०२२ ते दि. २१/११/२०२२ या मनाई आदेशाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या निर्गमित आदेशातील तरतुदींचे पालन तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता जिल्हा पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.