नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये ,सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन

सोलापूर - माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब , मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे.तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी.या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात , ठेचा बसतात.या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत रहा, असे आवाहन देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी केले.

महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राज्यस्तरीय वकील परिषदेत सरन्यायाधीश उदय लळित बोलत होते.यावेळी सोलापूरचे सुपूत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतल्याने त्यांचा सोलापूरकरांच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.यावेळी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकूर दत्ता, सोलापूरचे रहिवासी असलेले न्यायाधीश एम. एस. कर्णिक, एन. जे. जमादार, विनय जोशी, राज्याचे महाधिवक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.शब्बीर अहमद औटी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.मिलिंद थोबडे आदी उपस्थित होते.