ठाणे : राजाच्या राजकारणात आधीच दोन-तीन घडामोडींनी खळबळ उडून दिलेली असता आणि राजकारणाचा माहोल गरमागरमचा असतानाच आता राज्याच्या राजकारणातली आणखी एक मोठी बातमी आली आहे. ती म्हणजे आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावरती बलात्काराचा आणि धमकीचा गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजलेली आहे. यात केदार दिघेंसोबत (Kedar Dighe) आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकारणात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्याचे नवे जिल्हा प्रमुख ही मोठी जबाबदारी दिली होती. विविध मुद्द्यांवर ते एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनाही घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच हा गुन्हा दाखल झाल्याने ठाण्यातलं राजकारण पुन्हा वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे.

काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांना इशारा

दरम्यान काही वेळापूर्वीच त्यांनी दुसऱ्या एका प्रकरणात मुख्यमंत्र्यांना थेट इशाराही दिला होता. त्यांनी ट्विट करत लिहिले होते की, हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! ठाणे हा #शिवसेनेचा,#दिघेसाहेबांचा बालेकिल्ला…जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल,दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल!, असे ट्विट त्यानी केलं होतं. 

प्रकरणात आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता

पोलिसांनी मात्र या प्रकरणात आणखी काही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नवे आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याही प्रकरणाला राजकीय रंग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर केदार दिघे हे उद्धव ठाकरेंकडे उरलेला सर्वात सक्षम पर्याय म्हणून पुढे आलेले होते. मात्र या गुन्ह्याने पुन्हा एकादा खळबळ माजली आहे. यात फक्त गुन्हा दाखल झाला नाही तर कोणत्याही क्षणी केदार दिघे यांच्यावरती कारवाईची शक्यता आहे. या प्रक्रिया प्रकरणाचे धागेदोरे जसे उलगडत जातील तशी या गुन्ह्यातली सविस्तर माहिती बाहेर येऊ शकते.