रत्नागिरी : स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि यासाठी उद्योगांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. 

कौशल्य विकास विभागातर्फे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या पंडीत दिनदयाळ रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, कौशल्य विभाग सहाय्यक संचालक इनुजा शेख, जिल्हा सहा. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कोतवडेकर, रत्नागिरी आय.टी. आय. चे प्राचार्य शेटये, लांजाचे गवळी आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

व्यवसाय व उद्योग वाढीला प्रोत्साहन देण्याचे काम शासन करीत आहेत तथापि या उद्योगांनी स्थानिकांना डावलण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही असे सांगून सामंत म्हणाले की उद्योग उभारणी करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची भूमिका मी स्थानिक पालकमंत्री या नात्याने घेतली आहे.उद्योगांना कोणत्या प्रकारचे कुशल मनुष्यबळ हवे आहे हे त्यांनी सांगावे त्या स्वरुपाचे शिक्षण व प्रशिक्षण येथे उपलब्ध करुन रोजगारात स्थानिकांचा वाटा वाढावा यासाठी आपण प्रयत्न करु असे ते म्हणाले. 

आयटीआय मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा मुलत: ग्रामीण भागातून येतो त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बेताची असते अशा सर्वांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी संपूर्ण राज्यासाठीचे सर्वंकष धोरण ठरविण्यात येईल असेही उद्योगमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधांचा वापर करुन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करावे असे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअप यांचेअंतर्गत काल येथील फिनोलेक्स अकादमीत बूट कॅम्प झाला. नाविण्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांसाठी तीन पुरस्कार यात निश्चित करण्यात आले. यात जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरील विजेत्यांचा समावेश आहे. जिल्हयात व राज्यात सर्वोत्तम संकल्पना मांडणाऱ्या माधुरी कळंबटे यांना 1 लाख रुपयांचा राज्य व जिल्हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना 17 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान होईल. त्यांचा आजच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हास्तरावर द्वितीय पुरस्कार मयूर कोल्हे याला मिळाला असून तृतीय पुरस्कार विश्वजीत साळवी याला प्राप्त झाला आहे. या दोघांचाही यावेळी पुरस्कार व धनादेश देऊन गौरव करण्यात आला.