रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम ( हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहणार आहे. शिवनेरी व अश्वमेध या बसेसना ही भाडेवाढ लागू राहणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री बारा वाजल्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राहणार आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून कंडक्टरद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या 'आवडेल तेथे प्रवास' तसेच मासिक, त्रैमासिकव विद्यार्थी

पासेसना लागू राहणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असेही महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.