रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गावातील काही माजी पुढाऱ्यांकडूनच शासनाचे नियम पायदळी तुडवत आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून ही बांधकामे करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विना परवाना सुरू असलेली ही कामे थांबवत योग्य ती कारवाई संबंधित विभागाने करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वरवडे येथील पुलाच्या खालील भागात खाडीला लागूनच ही बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे गावातील एका माजी पुढाऱ्याने सिआरझेड कायद्याचे उल्लंघन करत या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. महसूल किंवा खारलँड विभागाची कोणतीही परवानगी न घेता ही बांधकामे करण्यात येत आहेत. माजी पुढाऱ्याने अनधिकृत बांधकाम सुरू केल्यानंतर इतर काहीजणांनी देखील या ठिकाणी अनधिकृत बांधकामांची मालिकाच सुरू केली आहे. वरवडे ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून देखील या बांधकामांना अभय दिल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे.

या अनधिकृत बांधकामावर महसूल विभाग आणि तलाठी कार्यालय का दुर्लक्ष करीत असून संबंधित यंत्रणा कोणाच्या दबावाखाली आहेत का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. जर खारविवाडा येथे किनारी बाजूला अशी बांधकामे सुरू राहिली तर काही दिवसांनी पाण्याचा ओघ बदलून पाणी भंडारवाडी येथील घरामध्ये शिरण्याचा धोका असून भविष्यातील धोका टाळण्यासाठी आताच या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.