घाटनांदूर (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे सोमवारी सकाळी अचानक १६ मेंढ्या मृत पावल्या. येथील मेंढपाळ शंकर दगडू वैद्य हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी शेताकडे नेत असताना गावाच्या बाहेरील गायरनात अज्ञाताने विकृत मानसिकतेतून विषारी पदार्थ मिसळून अन्नपदार्थ व भाकरीचे पसरवून टाकले होते. हे अन्नपदार्थ व भाकरीचे तुकडे मेंढ्यांनी खाल्ल्याने विषबाधा झाली. अवघ्या तासाभरात मेंढ्या तडफडू लागल्या; एक एक मेंढी तडफडून प्राण सोडून देत होती. माणसाच्या विकृत मानसिकतेमुळे मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. एकूण १६ मेंढ्या मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी एल गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे डॉ. बोने, डॉ. जावळे व नेमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच उपचार केल्याने उर्वरित मेंढ्यांना वाचवण्यात त्यांना यश आले आहे.

अचानक सोळा मेंढ्या मृत पावल्याने मेंढपाळ शंकर दगडू वैद्य यांचे जवळपास अडीच तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे पीडित मेंढपाळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी येथील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

तसेच ॲड माधव जाधव यांनी शंकर वैद्य यांच्या घरी भेट देऊन त्यांना पंधरा हजार (१५०००/-) रुपयांची आर्थिक मदत करून आधार दिला.यावेळी ॲड.माधव जाधव यांचे सोबत रामभाऊ वैद्य, धनंजय जाधव ,संजय रानभरे , रतन मोती व पिंटू गाढवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .परळी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अद्याप पर्यंत शंकर वैद्य यांच्याकडे दुर्लक्ष केलेले असताना किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड.माधव जाधव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आर्थिक मदत दिल्यामुळे शंकर वैद्य यांच्या कुटुंबीयांना फार मोठा आधार मिळाला आहे.