गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील तीन वर्षाचा विमा, तालुक्यातील बोगस शेततळे व पांदण रस्ते चौकशी, कापसाला तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये दर मिळावा यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सकाळी 11:00 वा. कल्याण – विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा फाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोच्या वेळी तलाठी आवटे व तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी निवेदन स्वीकारत या मागण्यांबाबत तात्काळ वरिष्ठांना कळवण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी विमा कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत अग्रीम विमा सर्व महसूल मंडळाला मिळाला पाहिजे आणि बोगस शेततळे व पांदण रस्त्याची तात्काळ चौकशी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी घोषणा दिल्या. यावेळी सिरसदेवी महसूल मंडळ, पाचेगाव महसूल मंडळ, तलवाडा व जातेगांव या परिससरातुन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके पाटील व माजी जिल्हा अध्यक्ष अशोकराव भोसले यांनी संबोधित करत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी उद्धव साबळे, सिद्धेश्वर डाके,मोहन अबुज, नवनाथ आबूज, विलास आबूज, परमेश्वर माने, अनंता नाईकवाडे, शेषराव त्रिभुवन, भुजंग डाके, मधुकर भारती, पंढरी शिर्के, सतीश राठोड, विनोद पवार, कैलास पवार, विशाल पवार, शिवाजी राठोड, रामराव राठोड, ओम प्रकाश रुपनवर, अनिल मुळे, मेघराज कादे, अरुण कादे, रामभाऊ साबळे, अंगद नाईकवाडे, अर्जुन नाईकवाडे, संजय शिर्के, शेख फत्तू मिया, शिवाजी रडे, विलास गरड, ज्ञानेश्वर नवले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. दरम्यान तलवाडा पोलीस ठाण्याचे स.पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्यासह पो.कॉ. खंडागळे सह आदी कर्मचारी यांनी चोक पोलिस बंदोबस्त केला.