औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या बसमधून खिडकीतून बाहेर डोकावणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी औरंगपुरा परिसरात घडली . हरिओम राधाकृष्ण पंडित असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे . हरिओम हा सरस्वती भुवन विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता . बजाजनगर परिसरात त्याचे घर आहे . शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी तो स्मार्ट सिटी बस ( एमएच 20 ईजी 9862 ) मध्ये बसला होता . बसमध्ये बसलेला असताना त्याने खिडकीच्या बाहेर डोके काढले . चालकाने वळण घेतली त्यावेळी त्याचे डोके खांबाला धडकले आणि त्यात तो जखमी झाला . तेथे असलेल्या एका महिला रिक्षाचालकाने त्याला तत्काळ रिक्षातून घाटीत नेले . मात्र , त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे .या घटनेमुळे सरस्वती भुवन विद्यालयात शोककळा पसरली आहे . घटनेची माहिती मिळताच शाळेतील सर्व शिक्षक घाटीत पोहोचले . पोलिसांनीदेखील तत्काळ घटनास्थळी धाव घेतली . औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानावर मनपाच्या स्मार्ट सिटी बस या वळण घेण्यासाठी जातात . एवढ्या कमी जागेतसुद्धा वेगाने वळण घेतल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे