शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.

शरद पवार म्हणाले, निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. आता शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आता नवीन चिन्ह (पान 7 वर)

घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर लढलो होतो. तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होतं. चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात.