बीड, दि.6 (प्रतिनिधी)ः- बालकाचे मोफत व सक्तीच्या शिक्षणावर शासन प्रशासनाकडून गदा आणण्याचे काम केले जात असून महाराष्ट्रातील तांडा, वाडी वस्तीवरील प्राथमिक शिक्षणामध्ये वीस पेक्षास कमी पटसंख्या असणार्‍या शाळांकडून माहिती मागविण्यात आली आहे. या शाळा बंद करण्याचा षडयंत्र शासनाकडून रचला जात असून कमी पट संख्येच्या शाळा बंदी विरोधात जिल्ह्यातील शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आले. तसेच तांडा, वाडी, वस्ती वरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळू नका असे आवाहन शिक्षक सुंदर राठोड यांनी केले आहे.

बालकाचे मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार बालक राहत असलेल्या ठिकाणापासून एक किमीच्या आत त्याच्या प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून त्यात कुठेही पटाचा उल्लेख नाही. आरटीई 2009 नुसार तांडे, वाडी, वस्ती, पाडे या दुर्गम भागात शाळा सुरू करण्यात आलेल्या असून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालेले आहे. 0 ते20 विद्यार्थीसंखेच्या आतील शाळा बंद करून शिक्षणाचे केंद्रीकरण करण्यात येऊ नये. वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय अतिशय चुकीचा व दुर्दैवी असून यामुळे ज्या तांडे,वाडी, वस्ती, पाडे यावरील शाळा बंद होणार आहे त्या ठिकाणच्या लोकांची उज्वल भविष्याची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. पट संख्येची अट लागू न करता तांडा, वाडी,वस्ती, पाडे या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा कायमची सुरू राहिली पाहिजे तरच गरीब दुर्गम भागातील जनता शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करेल नाहीतर शाळा बंद करून त्यांच्या उज्वल भविष्याची दोर कापण्याचे महापाप शासन म्हणून आपल्या कडून होईल. आरटीई कायद्यात पटसंख्येच्या अटीची तरतूद नाही त्यामुळे कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये. बालकांच्या शैक्षणिक मूलभूत अधिकाराची पायमल्ली करणारा निर्णय घेण्यात येऊ नये. तरी आपणास नम्रतापूर्वक विनंती करण्यात येते की विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून 20 विद्यार्थी संख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावे सांगण्यात आले. यावेळी सुंदर राठोड, अल्पसंख्याक संघटनेचे मुसा शेख, कास्ट्राई संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुर्यकांत जोगदंड, बहुजन शिक्षक संघटनेचे विजयकुमार समुद्रे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शि.संघाचे हरिदास घोगरे, म.रा.प्रा.शि.समितीचे राजेंद्र खेडेकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णु आडे, राजुदास राठोड, श्रीराम राठोड, राजेंद्र राठोड, इंजि.दिनेश चव्हाण, उत्तम भाऊ, शामराव मुळे, भिवराज कोकणे, विठ्ठल सानप, गणेश डीगे, रंजीत घोरड, बरडे, सुनील मुंडे, सुंदर राठोड, अर्जून राठोड, दादाराव राठोड, गणेश राठोड, अहिरे सर, दहिफळे सर, गंगाधर डवरे, मारुती चिल्लेवाड, विष्णू माने, दहिफळे सर, गाढे आर.डी., खेत्रे व्हि.एस, संजय दराडे यांच्यासह बहुसंख्येने शिक्षक आणि शिक्षण वाचविण्यासाठी जागरूक असलेले नागरिक उपस्थित होते.