रत्नागिरी : विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने जिल्ह्याला तडाखा दिला. विज पडून लांजा तालुक्यात दोन पाळीव जनावरं मृत झाली तर रत्नागिरी मिर्‍या येथे चार घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शनिवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी ११.६७ मिमी पाऊस झाला. त्यात दापोली १९, खेड १६, चिपळूण १६, संगमेश्‍वर ४, रत्नागिरी ३५, लांजा ८, राजापूर ७ मिमी पाऊस झाला. शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरला होता. विजांच्या कडकडाटामुळे संगमेश्‍वर, रत्नागिरीसह लांजात पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत होता. सायंकाळी आडवली येथे वीज पडून एक गाय आणि एक बैल मृत झाला. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे. लांजा शहराजवळील परिसरातही एका घराजवळ एका झाडावर वीज पडल्याचा प्रकार घडला; परंतु त्याची नोंद करण्यात आलेली नाही. 

रत्नागिरी तालुक्यात मिर्‍या आनंद नगर येथे काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निर्मला प्रभाकर जाधव यांच्या घराजवळ विज पडली. विजेचा लोळ शौचालयावर आला होता. विजेच्या धक्क्याने शौचालयाजवळील गटाराची लादी फुटली. जाधव यांच्या घरातील विजेचे बोर्ड, फ्रिज, इर्न्व्हटर जळून खाक झाले. याचा फटका आजूबाजूच्या दोन तिन घरांनाही बसला. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. राजू जाधव यांच्या घरातील फ्रिजही जळून गेला आहे. नुकसान झालेल्या वस्तूंचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे; मात्र काहींनी प्रशासनाकडे नोंद करण्यापेक्षा विजेच्या धक्क्याने जळालेल्या वस्तूं दुरुस्ती करण्यावर भर दिला होता.