रत्नागिरी : प्रत्येकाला आपले वाहन खूप प्रिय असते. तसा त्याचा नंबरही लय भारी असावा यासाठी कितीही रक्कम मोजायला अनेक वाहनधारक तयार असतात. त्यामुळे मग "व्हीआयपी" नंबरला प्राधान्य दिले जाते. मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना वाहनधारकांच्या खिशाला चाट बसणार आहे. याचा अध्यादेश शासनाने काढला असून पुढील महिन्यापासून चॉईस नंबरसाठी सध्या असलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन सीरियल सुरू झाल्यानंतर "व्हीआयपी" क्रमांकासाठी अर्ज घेतले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने हे क्रमांक दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने सर्व प्रकारच्या वाहनांची व्हीआयपी अथवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. या अधिसूचनेमध्ये निश्चित केलेल्या दरासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही व्हीआयपी नंबरची चांगली मागणी आहे. अनेकजण लकी नंबरसाठी दुप्पट ते तिप्पट रक्कम मोजायला तयार असतात. काहींचा नऊ हा लकी नंबर आहे. ९, ९९, ७८६, ९९९ व ९९९९ या वाहन क्रमांकासाठी प्रस्तावित दर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहने यांच्याव्यतिरिक्त अडीच लाख रुपये आहे तर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहनांसाठी ५० हजार रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या त्यासाठी अनुक्रमे दीड लाख रुपये व २० हजार रुपये आकारले जात आहेत.

यापूर्वी आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही क्रमांक वाहनांसाठी लागणार असेल तर त्यासाठी साडेसात हजार रुपये मोजावे लागत होते. आता यात दुप्पट वाढ होऊन किमान १५ हजार रुपये मोजून असे क्रमांक घ्यावे लागणार आहेत. दुचाकीसाठी तीन हजार असलेली रक्कम वाढवून ती ५ हजार रुपये करण्यात येणार आहे.