गेवराई तालुक्यातील तांदळा येथील घटना

गेवराई : 

 आपल्या शेतात कपाशीला पाळी घालत असताना एका शेतकऱ्याचा जलशी जातीचा बैल विद्युत तारेला चिकटून जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील तांदळा येथे रविवार दि.२५ रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली असून या शेतकऱ्यांचे जवळपास ३० ते ४० हजार रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने दिली आहे. 

    परसराम तुळशीराम हाकाळे (मु.पो.तांदळा ता.गेवराई) या शेतकऱ्याचे तांदळा शिवारात शेत असून नियमितपणे ते रविवार दि २५ सप्टेंबर रोजी ते आपल्या शेतात कपाशीला पाळी घालत असताना शेतातून गेलेल्या विद्युत तारेच्या खांबाला ताण असलेल्या तारेला चिकटून जलशी जातीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती विद्युत महावितरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महसूल विभागाला दिली असून घटनास्थळी महावितरण विभागाचे जाधव, पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. कुरकुटे यांनी भेट देवून सदरील घटनेचा पाहणी केली . तर या घटनेमुळे शेतकऱ्याचे जवळपास ४० हजार रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समजते आहे. तरी सदरील घटनेचा तात्काळ पंचनामा करुन शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.