रेणुकामातेचे उपपीठ: हिवरा चौंढाळा गावात विवाह न लावण्याची, दुमजली घर न बांधण्याची परंपरा.       

पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र हिवरा चौंढाळा येथील रेणुका मातेचे मंदिर श्री क्षेत्र माहूरगडावरील रेणुकामातेचे उपपीठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे हे गाव इतर गावांपेक्षा अनेक बाबतींत वेगळे आहे.या गावात एकही दुमजली घर नाही आणि गावात एकही विवाह समारंभ होत नाही.विहामांडवापासून दोन किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र चौंढाळा येथील टेकडीवर वसलेले रेणुकामातेचे हेमाडपंती मंदिर आहे हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बांधलेले आहे. 

मंदिराचे प्रशस्त ,भव्य बांधकाम वास्तुशास्त्रातील अजोड नमुना आहे . भक्कम दगडी चिरेबंदीच्या आत प्रशस्त प्रांगणातील मंदिर व भव्य ५० फुटी दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराला पाहताच मंदिराच्या भव्यतेची मह’ती लक्षात येते भाविकांची येथे मोठी गर्दी असते.हिवरा चौढाळा गावात सुमारे पाचशे घरे आहेत.या गावाभोवती पूर्वी दाट जंगल होते. यात हिवरा च्या झाडांची संख्या जास्त असल्याने चौंढाळा या गावाला हिवरा चौढाळा असे नाव पडले येथील मंदिराला कळस नाही. मंदिराला वीस खांबांचा भव्य सभामंडप आहे. 

या खांबावर कोरीव काम केलेले आहे . सभामंडप सुमारे १०२ फूट लांबीचा असून मंदिराचा गाभारा चार खांबांवर उभा आहे . मंदिराला तीस फूट उंचीची दगडी तटबंदी केलेली आहे . हिवरा चौंढाळा या गावात लग्नच होत नाहीत हे विशेष . रेणुकादेवी कुमारिका आहे , अशी श्रद्धा असल्यामुळे गावात लग्न लावले जात नाही . या गावातील सगळी लग्ने गावाबाहेरील मारुती मंदिराजवळ होतात . गावात कुणीही दोन मजली किंवा त्यापेक्षा अधिक मजल्याचे घर बांधलेले नाही आणि बांधत नाही. रेणुका मातेच्या पायाशी असावे , अशी त्यामागची भावना आहे .

 त्याचबरोबर या गावात कुणीही बाज किंवा पलंग वापरत नाहीत . त्याऐवजी लोक घरात झोपण्यासाठी ओटे तयार करून घेतात . मंदिराच्या अवतीभोवती मोठमोठ्या दगडी शिळा दहा किलोमीटर लांब , पाच किलोमीटर रुंदीपर्यंत जमिनीवर पसरलेल्या आहेत . या शिळांना लग्नाचे वऱ्हाड म्हटले जाते . या याबाबत आख्यायिका अशी आहे की , एका राक्षस राजाने देवीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि मोठे वऱ्हाड तो लग्नाला घेऊन आला . लग्नासाठी मोठा विवाह चा मंडप विहामांडवा येथे टाकण्यात आला . ते ठिकाण म्हणजेच आताचे विहामांडवा हे गाव होय देवीला हे लग्न मान्य नव्हते आणि देवीने लग्न करण्याकरिता अट घातली होती . लगतच्या क्षेत्रातून गोदावरी नदी वाहते . 

त्या नदीचे पाणी सूर्योदयापूर्वी आणायाचे अशी ही अट होती ; परंतु पाणी वेळेच्या आत न आणू शकल्यामुळे सर्व वऱ्हाडाचे शिळेत रूपांतर झाले . याचबरोबर महाराष्ट्राचे थोर संत एकनाथ महाराज यांना मातेने साक्षात्कार देऊन चौंढाळा येथे मी आहे , असे सांगितले तेव्हापासून दर पौर्णिमेस संत एकनाथ महाराज दर्शनास येथे येत आणि आजही नाथ वंशज नियमित दर्शनाला येतात . चौंढाळ्याची रेणुकामाता हे वारकरी संप्रदायाचे , तसेच संत एकनाथ महाराज यांचे कुलदैवत आहे . आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी महोत्सवात घटस्थापनेपासून भाविक मोठ्या संख्येने येतात . सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते . या काळात यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होते .

 चौढाळा येथे एक महिना अगोदरच उत्सवाची तयारी चालते . रंगरंगोटी , विद्युत रोषणाई व मोठ्या प्रमाणावर येणारे भाविक पाहता . पैठण येथून जादा गाड्या सोडण्यात येतात , घटस्थापनेपासून मंदिरात दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते . देवीला अभिषेक , सप्तशतीपाठ , नवमीला हवन व दसऱ्याला पंचक्रोशीतील भाविक सीमोल्लंघन करून दर्शनासाठी येतात . अष्टमीच्या दिवशी विहामांडवा येथून देवीला टिपूर आणला जातो . हा टिपूर विहामांडवा येथील जागृत ग्रामदैवत बलखंडी मंदिरातुन व गावातून वाजत गाजत चौंढाळा येथे देशमाने परिवार परंपरेनुसार आणत असतात . कुलदैवत असल्यामुळे दर मंगळवारी व शुक्रवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते . येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात , असेही मंदिराचे पुजारी आणि गावाचे सरपंच सतीष काळे यांनी सांगितले.