माढा तालुक्यातील सुर्ली येथून शिराळ (टें) कडे जात असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही घटना शुक्रवारी रात्री घडली. विठ्ठल अतुल कदम (वय १६) व रणजीत अतुल कदम (वय १४) दोघेही रा. शिराळ (टें) अशी मृत मुलांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास शिराळ (टें) येथून विठ्ठल व रणजित हे दोघे भाऊ सुर्ली येथे दळण घेऊन दुचाकीवरून गेले होते. दळण घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शेजारील तरुणांनी त्यांना टेंभुर्णी येथे खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी अकलूज येथील दवाखान्यात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

विठ्ठल हा दहावी उत्तीर्ण आहे. त्याने सोलापूर येथे आयटीआयला प्रवेश घेतला होता. तो शुक्रवारीच घरी आला होता. तर रणजित हा अकोले-खुर्द येथील बबनराव शिंदे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचाही अकोले खुर्द जवळ अपघाती मृत्यू झाला होता.पतीच्या निधनानंतर त्यांच्या आईने मोल मजुरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता. विठ्ठलला शिक्षण पूर्ण करून आईचे कष्ट कमी करण्यासाठी नोकरी मिळवायची होती.